भद्रावती : सीसीआय अंतर्गत कापूस खरेदीची अंतिम मुदत २८ फेब्रुवारीपर्यंतच असल्याने विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी धावपळ उडाली आहे. अनेक ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी बाकी असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यासह भद्रावती तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस शेतकऱ्यांकडेच पडून असल्याची माहिती पुढे आली आहे. खाजगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी सीसीआय खरेदीवर अवलंबून आहेत. मात्र खरेदीची मुदत संपण्यापूर्वी सर्व कापूस विक्री होईल का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बाजारात काही ठिकाणी कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच नोंदणी, स्लॉट मिळण्यात होणारा विलंब आणि खरेदी केंद्रांवरील गर्दी यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी कापूस तोडणी अजून सुरू असल्याचे सांगत सीसीआय खरेदीची मुदत वाढवावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा अनेक शेतकऱ्यांना कमी दरात कापूस विकण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.






