सांगली/कोल्हापूर, प्रतिनिधी:
अनुदानित व अंशतः अनुदानित हजारो शिक्षकांचा कार्यभार कमी करून संच मान्यतेचा (ड्राप्ट) मसुदा टाकण्यात आला. याविरुध्द कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर हाजारो कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी एल्गार केला व कार्यभार कमी करणा-या संच मान्यतेच्या मसुद्याची होळी करून निदर्शने केली. कोल्हापूर विभागीय प्रतिनिधी राज्य सहसचिव प्रा.दिलीप शितोळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन घेण्यात आले.
गेली ५० वर्षे कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यता सामाजिक व भौगोलीक स्थिती लक्षात घेऊन शाळा संहिता व या संदर्भात वेळोवेळी निर्गमित शासनादेशा नुसार केली जात होती. मात्र या वर्षीची संच मान्यता ऑनलाईन करतांना त्याच्या मसुद्यात संच मान्यतेचे प्रचलित निकष डावलण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांचा कार्यभार कमी झाला आहे. प्रशासनाने मनमानी पद्धतीने प्रचलित निकषांना खोडा घालून अत्यंत चुकीचा व अन्याय करणारा संच मान्यतेचा मसुदा टाकला. शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांचेवर अन्याय करणारा हा मसुदा असल्याचा आरोप करुण आंदोलनकर्त्यांनी या काळ्या मसुद्याची होळी आंदोलनादरम्यान केली व निषेध नोंदवला.
या संचमान्यतेत तातडीने दुरुस्ती करून प्रचलित निकषाच्या आधारे संच मान्यता करण्यात याव्यात, या वर्षीची संचमान्यता ऑफलाइन पद्धतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या स्तरावर करण्यात यावी , मान्यतेनुसार विषयाचा कार्यभार, प्रात्यक्षिक व स्वाध्याय याबाबतची किमाण विद्यार्थी सख्या, तुकडी टीकवण्याबाबत प्रचलित विद्यार्थी सख्येचे निकष, प्रवेशित सर्व विद्यार्थी ग्राह्य धरणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रा आण्णासाहेब बागडी, प्रा, विजय मेटकरी, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रा.सुरेश भिसे सचिव प्रा. दिलीप जाधव, सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ विलास खंडाईत सचिव प्रा. गोविंद वाघ, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष बी. आर. पाटील प्रा डी.ए.जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रा. शितोळे सचिव प्रा. पी.बी. वनवे , यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनामध्ये विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कौस्तुभ गावडे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या आंदोलनात हजारो कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक मोठ्या संख्येत उपस्थित होते.






