भद्रावती : शहरात बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते रेल्वेस्टेशन पर्यंत ये जा करण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. सध्या दोन्ही बाजूने अर्धा रस्ता हा दुकानदार आणि भाजीपाला विक्रेत्यानी काबीज केला आहे. काही मोठ्या दुकानदाराने फुटपाथ च्या समोर येत रस्त्यावरची पांढरी रेषा ओलांडून चक्क लोखंडी पाईप चे शेड उभे केले आहे. यात कपड्याची दुकाने, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक दुकानदारांचा समावेश जास्त आहे. यांच्या वस्तूचे रस्तावरचे शोरूम तर सकाळी सुरू होऊन थेट रात्रीच बंद होत असते. कमालीची बाब अशी की, प्रशासन मात्र अशा बड्या दुकानदारांवर मेहरबान आहे. यांच्या दुकानात खरेदी साठी येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या उरलेला बाकी रस्ता व्यापून टाकतात. मुख्यत्वे बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार, सातपुते मेडिकल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मस्जिद चौक, गांधी चौक हे ठिकाण तर मुख्य बाजारपेठ बनले आहे. यामुळे शहरात सर्व ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्ता उरत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. परंतु प्रशासन सध्या सुस्त दिसत असून त्यांना रस्त्यावरच्या वाढत्या अतिक्रमणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. प्रशासन अश्या दुकानदारांवर इतके मेहरबान का आहे? असा प्रश्न सर्वसाधारण जनतेला पडला आहे.

नागरिकांचे मत : भाजीपाला विक्रेत्यांना एक सोयीची जागा नगरपरिषद कडून देण्यात यावी. जेथे पार्किंग ची समस्या, वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूचे फुटपाथ मोकळे करून रस्त्यावरच्या पांढऱ्या रेषेच्या आत वाहने उभे करावे. यासाठी नगरपरिषद आणि पोलिस विभागाने प्रयत्न करावेत. म्हणजे वाहतूक सुरळीत होईल आणि अपघाताची शक्यता निर्माण होणार नाही. रस्त्यावर दुकाने लागायच्या आधीच जर कारवाई झाली तर रस्त्यावर दुकाने लागणारच नाहीत याकडे नगरपरिषदेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.






