महाराष्ट्रात वाजतोय मराठी चा डंका…..
माय मराठीला आले सुगीचे दिवस…..
चंद्रपूर
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यात मराठी विषयात पैकीच्या पैकी 100 गुण घेण्याचा बहुमान मुंबई येथील विद्यार्थीनी गायत्री पन्हाळकर हीने पटकाविला व महाराष्ट्रात मराठी विषयात इतिहास रचला.
आज दि.०५ मे २०२५ ला अनपेक्षितपणे बारावी बोर्ड परीक्षा-फेब्रु/मार्च-२०२५ चा निकाल जाहीर झाला. साधारण शिक्षण मंडळाच्या सांगण्यानुसार ०६ते १५ मे पर्यंत निकाल अपेक्षित होता, पण काल दि.०४ मे ला दुपारी दीडच्या सुमारास अचानक बातमी आली की, उद्या म्हणजे दि.०५ मे २०२५ ला दुपारी १-०० वाजता एच.एस.सी.बोर्ड परीक्षा फेब्रु./मार्च २०२५ ला जाहीर होणार. काल एकिकडे वैद्यकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण NEET ची परीक्षा होती. बारावीला प्रविष्ठ असणारे विद्यार्थी त्यांच्या NEET परिक्षेच्या गडबडीत असतांना म्हणजे ते विद्यार्थी परीक्षा कक्षात असतांना ही निकालासंदर्भात बातमी प्रसिध्द झाली. जेव्हां ते विद्यार्थी पाच सव्वा पाच ला परीक्षा दालनातून बाहेर पडले, तेव्हां त्याच्या पालकांनी त्यांना ही बातमी देऊन आश्चर्याचा धक्का दिला.

आज जाहीर झालेल्या एच.एस.सी.बोर्ड परीक्षा निकालात पहिल्या क्रमांकावर कोकण विभाग (९६.७४%), दुस-या क्रमांकावर कोल्हापूर विभाग(९३.६४%), तीस-या क्रमांकावर मुंबई विभाग(९२.९३%), चवथ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर(९२.२४%), पाचव्या क्रमांकावर अमरावती विभाग(९१.४३%), सहाव्या क्रमांकावर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे विभाग(९१.३२%) सातव्या क्रमांकावर नाशिक विभाग(९१.३१%), आठव्या क्रमांकावर महाराष्ट्राची उपराजधानी आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांचा जिल्हा नागपूर विभाग(९०.५२%) आणि सर्वात शेवटी म्हणजे नवव्या क्रमांकावर लातुर विभाग(८९.४६%) असा निकाल लागला.
सरासरी निकाल विचारात घेता मुंबई विभाग तीस-या स्थानावर असला तरी रामनिरंजन झुनझुनवाला कनिष्ठ महाविद्यालय, घाटकोपर, मुंबई येथील विद्यार्थीनी कु.गायत्री रेखा दीपक पन्हाळकर हीने मराठी विषयात १०० पैकी १०० गुण घेऊन महाराष्ट्रातून भाषा विषयात- मराठीमध्ये सर्वाधिक १०० गुण प्राप्त करून इतिहास रचला. याच कनिष्ठ महाविद्यालयाची कु.प्रांजल अर्चना प्रशांत वाळेकर हीने मराठी विषयात १०० पैकी ९७ गुण प्राप्त केले . मुंबई विभाग जरी निकालाच्या टक्केवारीत तीस-या स्थानावर असले, तरी मराठी विषयामध्ये सर्वाधिक पैकीच्या पैकी गुण घेत महाराष्ट्रात मराठीची पताका उंचावली.
कु.गायत्री पन्हाळकर आणि कु.प्रांजल वाळेकर यांना मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ मुंबई जिल्हा प्रतिनिधी प्रा.दीपा ठाणेकर, प्रा.डाॅ.लतिका भानुशाली तसेच मुंबई विभागाचे सहायक मुख्य नियामक महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा.बाळासाहेब माने, मुख्य नियामक महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या उपाध्यक्षा प्रा.डाॅ.प्रतिभा बिश्वास यांचेही अभिनंदन. कारण साधारणतः अगदी गत वर्षापर्यंत म्हणचे २०२४ पर्यंत मराठी विषयामध्ये कधीही पैकीच्या पैकी गुण मिळाले नव्हते. ती कीमया या वर्षी मुंबई विभागात झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी विषय शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या. मराठी विषयाला गुणाच्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत उच्चांक प्राप्त झाला.
या दैदीप्यमान यशाबद्दल कु गायत्री पन्हाळकर, तसेच तीला मार्गदर्शन करणाऱ्या मराठी विषय शिक्षक महासंघाच्या मुंबई प्रतिनिधी प्रा. दीपा ठाणेकर, प्रा.डाॅ लतिका भानुशाली, महासंघाचे सचिव प्रा.बाळासाहेब माने, उपाध्यक्षा प्रा. डॉ प्रतिभा विश्वास यांच्या वर संपूर्ण महाराष्ट्रातातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .






