पुलाची उंची कमी असल्याने घडली दुर्घटना
वरोरा, दि.१९ : आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच चंदनखेडा शेगाव रस्त्यावरील स्मशान भूमी जवळ असलेल्या पुलाची उंची फारच कमी असल्यामुळे नेहमीच इथे वाहतूक ठप्प होत असते. अशातच आज झालेल्या अती पावसामुळे पुलावर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आयशर कंपनीचा ट्रकच वाहून गेला.
प्राप्त माहितीनुसार, हा ट्रक मथुरा येथील असून गाडी नंबर एच. आर. ७३ बी ४७८३ ही गाडी चंद्रपूर वरून भंडारा येथे चालली असताना चंदनखेडा जवळील पुलावरून पाण्यामध्ये वाहून गेला. तब्बल अर्ध्या तासानंतर ड्रायव्हरला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून ड्रायव्हर सुखरूप असला तरी त्याने मद्य प्राशन केले असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. या पुराच्या पाण्यात ट्रक जरी वाहून गेला असला तरी सुदैवाने कुठली जीवित हानी झालेली नाही. त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी पुन्हा एकदा नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.






