
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25 वा वर्धापनदिन साजरा होत आहे, त्यानिमित्त दिल्लीतील सोहळ्यात आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आपले अंत्यंत विश्वासू बिनीचे शिलेदार असलेले आणि राष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रफुल्ल पटेल आणि कन्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी घोषणा केली आहे. याच सोबत पक्षातील अन्य काही नेत्यांना राष्ट्रीय पातळीवरच्या जबाबदाऱ्या देखील पवार यांनी वाटून दिल्या आहेत. मात्र यामध्ये अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
आज दिल्लीत शरद पवार यांनी देशातील विविध राज्यांची जबाबदारी पक्षातील नेत्यांकडे सोपविली. यामध्ये महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांच्या नावांचा समावेश आहे. तर उर्वरीत नेते महाराष्ट्राबाहेरील आहेत. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीची जबाबदारी देखील सुप्रिया सुळे याच पाहणार आहेत. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, झारखंड, राजस्थान या राज्यांची जबाबदारी देण्यात आली.
पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे पक्षातील त्यांचे जूने सहकारी सुनील तटकरे यांच्यावर देखील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे ओडिशा, प. बंगाल, राष्ट्रीय समिती सत्र, परिषदा, निवडणूक आयोगासंबधित समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अल्पसंख्यांक समाज आदी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. जितेंद्र आव्हाडांनी बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, एसी, एसटी, ओबीसी कामगार या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच डॉ. योगानंगद शास्त्री यांच्याकडे दिल्ली सेलची जबाबदारी देण्यात आली आहे.






