
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीव्दारे २०२२ सालासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात ९३३ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यातील ७० हून अधिकजण महाराष्ट्रातील आहेत. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपैकी जवळपास १२ टक्के उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत. देशात यंदा मुलींनी बाजी मारली असून महाराष्ट्रातून देखील कश्मिरा संखे हिने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर देशपातळीवर ती २५ व्या स्थानी आहे. आज जाहीर झालेल्या निकालात पहिल्या १०० जणांमध्ये महाराष्ट्रातील ७ हून अधिक उमेदवार महाराष्ट्रातील आहेत.
अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत दिवसेंदिवस मराठी टक्का वाढत असून मराठी अधिकाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. काही वर्षांपूर्वी बोटावर मोजण्याएवढी संख्या महाराष्ट्रातून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची असे. आता मात्र युपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत महाराष्टातील टक्का वाढताना दिसून येत आहे. परीक्षेचा अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.






