
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस धाडल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाकडून आज निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वांचं लक्ष त्या निकालाकडे लागलेलं असताना पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस मनीलाँड्रिंग आणि 570 कोटी रुपयांच्या मालमत्तांची जप्ती या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पहिले आरोपपत्र दाखल केले होते. आयएलअँडएफएसप्रकरणी ईडीने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील निवासी व व्यावसायिक इमारती आणि बँक खाती जप्त केलेली आहेत.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही याआधीही या कंपनी प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.
दरम्यान जयंत पाटील यांनी आतापर्यंत ईडीची कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असं सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसनंतर काय भूमिका घेतली जाते हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांनी यापूर्वी केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीला सामोरे गेले होते. आता जयंत पाटील हे ईडीच्या नोटीसनंतर सविस्तरपणे काय भूमिका मांडतात, हे पाहावं लागणार आहे. जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस आणि सत्तासंघर्षाचा निकाल हा योगायोग असावा, असं उदय सामंत म्हणाले.






