May 9, 2023 12:28 PM Mumbai

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकार राज्य शासकीय सेवेतील थेट 75 हजार पदांची मेगा भरती होणार; ही पदे 15 ऑगस्टपूर्वी भरण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली. मुळात राज्याच्या शासकीय विभागांमध्ये जवळपास पावणेतीन लाख पदे रिक्त आहेत. भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने राज्य सरकारने 75 हजार शासकीय पदभरतीची घोषणा केली खरी; पण अद्याप पदभरतीची कार्यवाही सुरु झालेलीच नाही. राज्यात लाखो सुशिक्षित बेरोजगारांचे मेगाभरतीकडे लक्ष आहे. दरम्यान, आगामी निवडणूकांमुळे मेगाभरती आचारसंहितेत अडकेल, अशी सद्य:स्थिती आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासकीय सेवेतील 75 हजार रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. ही पदे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत भरणार असल्याचेही जाहीर केले होते. मात्र, सरकार राज्यातील त्यापूर्वी जाहीर झालेली आणि विविध कारणांमुळे रखडलेली विविध विभागांची भरती प्रक्रिया सुरू करू शकलेले नाही. त्यात या नव्या भरतीबाबत प्रशासकीय पातळीवर संथ गतीने हालचाली सुरू आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांसह आता पुढे लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आहेत, यामुळे 75 हजार पदे भरण्याची डेडलाइन हुकण्याची ठळक चिन्हे दिसत आहेत.
रखडलेली भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी यासाठी आम्ही संबंधित मंत्र्यांचे उंबरठे झिजवले; पण परीक्षा लवकरच होईल एवढेच उत्तर आम्हाला मिळत आहे. सरकारची ही उदासीन भूमिका राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बरबाद करते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
– महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
पूर्वीची रखडलेली भरती प्रक्रिया अद्याप सुरू नाही
- राज्यातील जिल्हा परिषदांमधील 13 हजार 512पदे भरण्याचा निर्णय 26 मार्च 2019 रोजी घेतला होता. तेव्हापासून रखडलेली ही भरती प्रक्रिया 4 वर्षे 2 महिने होऊनही ग्रामविकास विभाग घेऊ शकलेला नाही.
- आरोग्य विभागाच्या ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्यामुळे रद्द करण्यात आलेली भरती अद्याप सुरू झालेली नाही.
- पशुसंवर्धन विभागाची 2017 आणि 2019 मध्ये जाहीर झालेली भरती प्रक्रिया 17 जानेवारी 2023 रोजी रद्द करण्यात आली, ती भरतीही रखडलेली आहे.
- राज्यात तलाठ्यांची पदे भरण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, त्याबाबतही अजून प्रगती झालेली नाही.
- 18 एप्रिल 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या भरती प्रक्रियेचा सरकारने आढावा घेतला तेव्हा यातील केवळ 6,499 पदे आतापर्यंत भरण्यात आल्याचे समोर आले.






