वरोरा, दि.26 : वरोरा-चिमूर हायवे पासून जवळच असलेल्या रामदेगी लगत ताडोबा जंगलाला लागून असलेल्या निमढेला तलावात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एकही थेंब पाणी नसल्यामुळे पाळीव प्राण्यासहित वन्यजीव पिण्याच्या पाण्यासाठी भटकताना दिसत आहे.
जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेचे लाट उसळली असुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरिकासहीत सर्वांना पडला आहे. तहान लागली की पाणी नागरिक विकत घेऊन तहान भागवत असतात परंतु वन्यजीव, पशुपक्षी, पाळीव प्राणी यांचे काय? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींना पडलेला आहे. निमढेला, रामदेगी हे विदर्भात नावाजलेलं पर्यटन स्थळ आहे, तलावापासून दोन किलोमीटर रामदेगी असून या ठिकाणी नेहमी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तलावात पशुपक्षी, वन्यजीव मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी फिरताना दिसत असून पाण्याअभावी पक्षांना मात्र मुकावे लागत आहे. नियमानुसार तलावामध्ये 20 टक्के पाणी असणे अनिवार्य असतानासुद्धा तलावात पाणी नसल्यामुळे वन्यजीव प्रेमी संस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

निमढेला तलावाचे अंतर जवळपास दोन किलोमीटर असून सतत पावसाळ्यामध्ये ओव्हर फ्लो होऊन वाहणाऱ्या तलावात दोन वर्षापासून उन्हाळ्याच्या दिवसात पाणी नसणे हे मात्र कुठेतरी सबंधित प्रशासनकडून जाणून बुजून करण्यात आलेले काम आहे का ? निमढेला तलाव याला अपवाद ठरला आहे या ठिकाणी मार्च महिन्यापासून एकही थेंब पाणी नसल्याने निमढेला तलाव परिसरालीत बफर जंगलातील प्राणी, वाघ, अस्वल, बिबट, मोर रांनगवा, डुक्कर, चितल, ससा, बंदर, भेडकी, आदी जंगली प्राणी तसेच विविध प्रकारच्या पशुपक्षी या तलावर पाण्याकरता परिसरात दिसून येत असतात. तसेच गावातील पाळीव प्राणी सुद्धा या तलावातील पाण्यासाठी अवलंबून असतात गावातील विहीर, बोलवेल यांच्या पाण्याचा साठा कमी झाल्याने नागरिकांना पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळी दिवस सुरू असून पाण्यासाठी गावातील पाळीव प्राणी यांना पिण्याच्या पाण्याच्या भटकंती करावी लागत आहे, त्यामुळे वन्य प्राणी आपली शिकार, तहान भागवण्यासाठी गावाकडे वळल्याचे दिसून येत आहे. नीमधेला परिसरात एकच तलाव आहे या तलावावर वन्य जीव तहान भागवत असतात. परंतु या तलावाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात येत असल्याने उन्हाळ्यात तलाव कोरडा होतो त्यामुळे राखीव पाणीसाठा ठेऊन शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी जगदीश पेंदाम तरुण पर्यावरणवादी मंडळ यांनी केली आहे.






