भद्रावती : “विद्यार्थ्यांनो आई-वडिलांनी तुमच्या सुखासाठी खस्ता खाल्ल्या. हालअपेष्टा सहन करीत तुम्हाला शिकविले. पोरांची प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी काबाडकष्ट केले आहे.उद्या मोठे झाल्यावर कृपया आपल्या आई-वडिलांच्या त्यागाला विसरू नका. त्यांचे कष्ट आणि तुमच्यावरील प्रेम कायम लक्षात ठेवा. आयुष्यात सज्जन माणूस बना आणि समाजाच्या कामी या” असे विचार विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात पदवीदान समारंभात अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते.

यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सागर वझे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज आस्वले, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, डॉ. विजय टोंगे, डॉ. जयवंत काकडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुख्य मार्गदर्शन करताना डॉ सागर वझे यांनी सांगितले की “शिक्षण ही आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. इथेच थांबू नका तर अभ्यासात सातत्य ठेवा. अलीकडे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचा आयुष्यात सदुपयोग करून घ्या असे विचार या मांडले. यावेळी प्रा. धनराज आस्वले यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात संधीचे सोने करण्याचा सल्ला दिला. यावेळी विविध पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ
नामदेव उमाटे, संचालन डॉ. ज्योती राखुंडे आभारप्रदर्शन डॉ. गजानन खामनकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी पदवी प्राप्त करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, महाविद्यालयातील वरिष्ठ कनिष्ठ विभागातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






