वरोरा : एकोणा कोळसा खाणीत आवागमन करणारी जड वाहतूक ही वरोरा शहरातून जात नाही, वरोरा शहराच्या प्रवेशद्वारासमोर एक मोठ्ठा फलक देखील लावला आहे, असे शपथपत्र एकोणा कोळसा खाण प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिले आहे. यामुळे आता ही बाब स्पष्ट झाली आहे की एकोणा कोळसा खाणीत आवागमन करणारी जड वाहतूक वरोरा शहरातून नियमबाह्यरीत्या होत आहे. त्यामुळे सदर वाहतूक शहराच्या मार्गावरून होवू देवू नये, पोलीस प्रशासनाने याबाबतीत कायदा व सुव्यवस्था सांभाळावी व जनतेनी सतर्क राहून सदर वाहतूक बंद पाडावी, असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

वरोरा तालुक्यातील वेकोलीच्या एकोणा कोळसा खाणीतून वरोरा-माढेळी रोड मार्गे वणीपर्यंत शहरातून सुरू असलेली कोळशाची वाहतूक त्वरित थांबवून वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता बनविण्याच्या मागणीला घेवून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रवींद्र शिंदे यांचे नेतृत्वातून वरोरा वासीयांतर्फे येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षाताई खेमराज कुरेकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलेली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एकोणा कोळसा खाण कंपनी प्रशासनाला नोटीस बजावला व सदर याचिकेतील मागणीनुसार कंपनीला उत्तर मागितले होते. यावर कंपनी प्रशासनाने शपथपत्र देवून वरोरा शहरातून जड वाहतूक जात नसल्याचे स्पष्ट केले. कंपनी प्रशासनाने शपथपत्रात असे नमूद केले की, वरोरा शहरातून वेकोली किंवा इतर पेटी कॉन्ट्रॅक्ट मधील वाहतूकदारांकडून कोळशाची कोणतीही वाहतूक केली जात नाही. कोळशाच्या वाहतुकीसाठी कोणीही वाहतूकदार वरोरा शहरात प्रवेश करणार नाही याची खातरजमा स्वत: वेकोली ने केली आहे. वरोरा शहाराच्या प्रवेशद्वारासमोर एक मोठा फलकही लावला आहे. कोळशाच्या वाहतुकीसाठी वरोरा शहरात न येण्याची विनंती सदर फलकाद्वारे शहर वाहतूकदारांना करत आहे. त्यामुळे वरोरा शहरातून कोळशाची वाहतूक होत असल्याची याचिका पूर्णत: निराधार आहे, असे कंपनी प्रशासनाचे म्हणणे आहे. कोळशाची वाहतूक वरोरा-माढेळी मार्गे माढेळी, सोईट, खैरी, वडकी, खांजी, येथून वळती होते आणि हा मार्ग वरोरा शहरापासून सुमारे ८५ किमी अंतरावर आहे आणि सदर मार्ग हा सोईट, माढेळी, वरोरा, वणी बायपास रस्ता तयार करून वापरात येईपर्यंत वापरला जाईल, असे कंपनी प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता जर शहरातून सदर जड वाहतूक होत असेल तर ती नियमबाह्य आहे, असे स्पष्ट होते. म्हणजे एकोणा खाण प्रशासनाची भूमिका ही दुटप्पीपणाची असल्याचेही निदर्शनास येते. एकीकडे शपथपत्र द्यायचे व दुसरीकडे वाहतूक सुरू ठेवायची, ही कंपनीची दुटप्पी भूमिका आहे. यामध्ये आता कायदा व सुव्यवस्था सांभाळायची जवाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. त्यांनी वरोरा शहरातून नियमबाह्य रीत्या जाणारी जड वाहतुकीवर आळा घालावा. वेकोली प्रशासनाने अशा वाहतूकदारास सूचना द्याव्यात व वरोरावासियांना सतर्क राहून अशी जड वाहतूक होवू देवू नये.

वरोरा शहरातील टोल नाका जवळ पोलीस चौकी तयार करावी व आवागमन करणाऱ्या जड वाहतुकीवर नियंत्रण प्रस्थापित करावे, दिवसा व रात्रीच्या वेळी टोल नाक्यावर नोंद झालेल्या जड वाहनांना चालान करावे, असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे म्हणाले.याबाबत उपविभागीय महसूल अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी यांना शिवसेनेतर्फे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पत्र देवून अवगत करण्यात आले आहे. याचिकाकर्त्या तर्फे ॲड. रणजित गहलोत यांनी बाजु मांडली आहे.






