भद्रावती : चंद्रपूर येथे निघालेला भव्य ओबीसी महामोर्चा हा कोणतेही राजकीय स्वरूप न येवू देता यशस्वी झाला आहे. गांधी चौक, चंद्रपूर ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत आज रविवार दि. १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सर्व पक्षीय तथा ओबीसीतील सर्व जातनिहाय संघटनांनी मिळून महामोर्चा काढला. या महामोर्चात हजारोंच्या संख्येत ओबीसी समाज बांधव उपस्थित राहत महामोर्चा यशस्वी केला.

ओबीसी मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय सर्व्हे व्हावा व ओबीसी मुलामुलींचे हॉस्टेल सुरु करून स्वाधार योजना लागू करावी, या प्रमुख मागण्या घेऊन सर्व पक्षीय तथा ओबिसीतील सर्व जातनिहाय संघटना मिळून ओबीसींचा आवाज बुलंद केला. सदर आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारनी ओबीसी कार्यकर्ते व नेत्यांसोबत चर्चा करावी व ओबीसी समाजाला आश्वस्त करावे.

या महामोर्चात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक तथा ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, सामाजिक कार्यकर्ते एड. पुरुषोत्तम सातपुते, एड.विजय मोगरे, एड. दत्ता हजारे, एड. जयंत साळवे, नंदू खणके, राजेश बेले, डॉ. कांबळे, प्रा. अनिल शिंदे, डॉ. महाकुलकर, प्रा. अनिल डहाके, गोमती पाचभाई, मनीषा बोबडे, आदी विविध पक्षाचे तथा जातनिहाय संघटनेचे पदाधिकारी, इतर मान्यवर, कार्यकर्ते व ओबीसी समाज हजारोंच्या संख्येने उपस्थित होता. ओबीसी महामोर्चात सहभागी सर्व ओबीसी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मी एक ओबीसी बांधव म्हणून आभार मानतो.






