चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कवी, गझलकार सुनील बावणे – निल यांच्या “स्याडा कोटसा भरते” या झाडीबोलीत काव्यसंग्रहाला विदर्भ साहित्य संघ नागपूरचा ‘नवोदित साहित्य लेखन पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. दिनांक १४ जानेवारी २०२६ ला आयोजित नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाच्या १०३ वा वर्धापन दिन, पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक सुनील कुमार लवटे, नागपूर विद्यापीठ कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर , मान. मिलिंद जोशी सर पुणे, नि. न्या. विकास शिरपूरकर सर, विश्वस्त मान. रवींद्र ठाकरे, वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीपजी दाते, उपाध्यक्ष राजेंद्र डोळके, सरचिटणीस विलास मानेकर आणि उपस्थित सर्व साहित्यिक मान्यवर यांच्या उपस्थितीत सुनील बावणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विदर्भ साहित्य संघाच्या नामांकीत पुरस्कारापैकी हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या झाडीबोलीतील कविता व गझल लिखनाला आणखीनच नवचैतन्य निर्माण होईल असे मत कवी लेखक गझलकार सुनील बावणे यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वीही त्यांना अनेक साहित्य मंचाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सुनील बावणे हे एका गाव खेडे वायगांव ( तु.) इथून आपली साहित्यिक आवड जोपासत, बल्लारपूर पेपर मिल येथे कामगार असून, कामगार क्षेत्रात काम करत असताना सुद्धा साहित्याची आवड जोपासत आहेत . प्रमाण मराठी भाषेसोबतच झाडीबोलीतील लिखाण करणारे लेखक म्हणून त्यांची साहित्य क्षेत्रात ओळख आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण लिखाणासाठी आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
नुकताच त्यांचे जन्म गावी जय हिंद फाउंडेशन आणि जगन्नाथ बाबा महाविद्यालय तसेच गावकऱ्यांच्या आयोजित एका स्नेह मिलन कार्यक्रमांमध्ये त्यांच्या या साहित्य कृतीचा सन्मान म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या साहित्य सेवेसाठी कामगार क्षेत्रातून, रसिक, मित्र वर्गातून, आप्त परिवाराकडून त्यांच्या समोरील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले आहे.






