सांगली, प्रतिनिधी:
श्रमसंस्काराच्या माध्यमातून समाजाशी नाळ व्यक्तिमत्त्वाचा विकास चारित्र्याच्या संस्काराबरोबरच देशभक्ती, राष्ट्रभक्ती, निस्वार्थी सेवेची बीजे पेरण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जाते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर तानाजी चौगुले यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेज विटा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालय आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे समारोप प्रसंगी ते बोलत होते.
घोलवड तालुका खानापूर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी बळवंत कॉलेजचे प्राचार्य डॉ सी आर बोबडे होते.
पुढे बोलताना प्राध्यापक डॉ तानाजी चौगुले म्हणाले ‘कोणतेही काम हलके नसतील हा गांधीजींचा संस्कार लक्षात घेऊन संस्कार शिबिराच्या सहभागातून संस्काराबरोबर संस्कृतीची ओळख होते. समाजाचे ऋण फेडण्यासाठी कृतीतून संदेश देणारी संघटना म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेची जगभर ओळख आहे.’ अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ सी आर बोबडे यांनी शिबिरातील सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एकरूप होऊन केवळ सात दिवस समाजाविषयीची कळकळ न ठेवता श्रम संस्काराचा वसा आयुष्यभर जोपासण्याची भावना व्यक्त केली.
राष्ट्रीय सेवा योजनेची वरिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.प्रवीण बाबर यांनी प्रास्ताविकात सात दिवस शिबिरार्थीनी ग्राम स्वच्छता स्मशानभूमीची स्वच्छता, वनराई बंधारा, ओढ्याचे खोलीकरण, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना याचबरोबर सामाजिक प्रबोधनासाठी पथनाट्याचा वापर करून समाजप्रबोधन केले याबाबतचा आढावा आपल्या प्रस्ताविकात मांडला.
प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व रोपाला पाणी घालून सुरुवात करण्यात आली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममलिया मॅडम यांनी केले तर आभार ज्युनिअर विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप जाधव यांनी मानले . यावेळी प्रा.किर्दत, संकेत गुजले साक्षी माळी, अविनाश जाधव, समिक्षा धनवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या समारंभास ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक सर्जेराव सावंत, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नितीन जगताप, डॉ. दिलीप जाधव, कार्यालयीन अधीक्षक विलास मासाळ, डॉ किर्दत, मुख्याध्यापक राजेंद्र पुजारी, प्रा. डॉ. झुंजारराव कदम प्रा. संताजी सावंत, प्रा.अजित साळुंखे, प्रा.आप्पासो वानकर, प्रा. संतोष कदम, कार्यक्रमाधिकारी सौ रंजना बागल, प्रा. संकेत राठोड, सौ साईका तांबोळी, प्रा श्रीमती एस. आर. जाधव, प्रा.माधुरी पाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सदस्य , ग्रामस्थ व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






