वरोरा : तालुक्यातील अर्जुनी तुकुम ताडोबा व्याघ्र प्रकल्प जंगला लगत कोर मध्ये असलेले जवळपास २००० लोकसंख्या असलेले आदिवासी गाव आहे. या गावाला लागून ताडोबाचे जंगल असून नेहमीच वन्य प्राण्यांची हलचल असते. या ठिकाणी शेतकरी मुख्य व्यवसाय धान शेती करत असून शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय करतो. परंतु शेती हंगाम झाल्यानंतर येथील नागरिकांना रोजगारासाठी बाहेर ठिकाणी भटकंती करावी लागते. भानुसखिंडी तेरा हा गेट पर्यटन सुरू झाल्यास परिसरातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल व परिसरातील आदिवासीचा विकास होईल.

तालुक्या पासुन २५ किलोमीटर असलेले भानुसखिंडी गेट आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यातील नागरिकांना हा मार्ग जवळ आहे. शेगाव हे मोठी बाजारपेठ असलेले परिसरातील मोठे गाव असून ६० ते ७० गावासाठी महत्त्वाचे आहे. अर्जुनी तु. येथे वन विभागाच्या तीन कूटी असून जंगलाच्या रक्षणासाठी या ठिकाणी वन कर्मचारी कायमस्वरूपी राहत असतात. काही दिवसातच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार असून या अगोदर गेट सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. भानुसखिंडी गेट जंगल पर्यटनासाठी सुरू झाल्यास जिल्ह्यात पर्यटक वाढून परिसरातील अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, सोनेगाव किनारा, वायगाव, चारगाव, धानोली आदी गावात सहित मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या शेगाव येथे बाजार आणि इतर व्यवसायाला चालना मिळेल. शेतकऱ्यांना छोटे कुटीर उद्योग उभे करण्यास मदत होऊन जिल्ह्यात विकासाला चालना मिळेल.

भानुसखिंडी गेट पर्यटनासाठी सुरू करण्याकरीता ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन संबंधित अधिकाऱ्याला पाठवले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत वनरक्षक, तथा क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांना माहिती सादर करण्याकरीता 2/5/ 2023 ला वनमंत्र्यांकडून पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबाच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी पर्यटक गेट सुरू झाले असून यामध्ये जोगापुर, बल्लारशा, जुनोना, सोमनाथ या गावाचा समावेश आहे.भानुसखिंडी परिसरात, वाघ, बिबट, अस्वल, चितळ, सांबर, निलगाय, रानगवा असे अनेक वन्य प्राणी असून मोठ्या प्रमाणात पक्षी सुद्धा आहे. मागील अनेक वर्षापासून छोटा मटका, बबली, भानुसखिंडी व तिचे बच्चे या वाघाने नागरिकांना मोठ्या प्रमाणात भूरड घातलेली असून नेहमीच प्राणी गावालगत शेत शिवारात दिसत असतात.या परिसरात वन्य प्राण्यासाठी मुंडा परिसर, भानुसखिंडी, भानोबा, दौना, सांबरडोह, काळा आंबा याठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सूद्धा पिण्यासाठी मिळत असल्याने नेहमीच वन्य प्राणी या ठिकाणी वास्तव करत असतात. वन्य प्राण्यांमुळे जंगला लगत शेती पिकांचे नुकसान होत असल्यामुळे परिसरातील हजारो हेक्टर जमीन पडीत आहे. वन्य प्राण्यांचे हल्ल्यात अनेक पाळीव प्राणी आतापर्यंत ठार झालेले आहे. त्यामुळे ताडोबातील भानुसखिंडी तेरा गेट सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळून विकासासाठी चालना मिळेल.






